* कमी उंचीच्या पुलांवरून धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन.
* सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण.
हिंगोली | सहारा न्यूज नेटवर्क (Saharanews.in):
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या ताज्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तीव्र शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
धोकादायक प्रवास आणि पर्यटनस्थळांवर जाणे टाळा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवरून दीड ते दोन फूट किंवा त्याहून अधिक उंचीने पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून पायी अथवा वाहनाने ओलांडण्याचे धाडस करू नये. तसेच, पावसाच्या दिवसांत नदीकाठावरील पर्यटनस्थळांना भेटी देताना निर्धारित सुरक्षित मर्यादेच्या पलीकडे जाणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नियम मोडल्यास पोलिसांकडून कडक कारवाई
“नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. जे लोक नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालतील, अशा व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर अनेकदा चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. कोणत्याही अडचणीच्या किंवा आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला तत्परतेने सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.